पुणे- राज्य सरकारने प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर जाचक अटी लादल्या आहेत. याबाबत सरकारकडे अनेकदा मागणी करूनही त्याची बिलकुल दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक संघटनांनी येत्या २ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक आणि प्रतिनिधी महासंघाने दिली आहे.
राज्यातील प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला वाहतूक संघटना महासंघाचे अध्यक्ष डाॅ.बाबा शिंदे, वाहतूकदार बचाव कृती समितीचे संयोजक उदय बर्गे,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रकाश गवळी आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारने १० दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी बंद केला जाईल, या भूमिकेला सर्वांनी एकमताने पाठिंबा दर्शवला. सक्तीच्या ई-चलन वसुलीला तत्काळ स्थगिती द्यावी, ई-चलन तक्रीरींसंदर्भात तक्रीरींचे वेळोवेळी निराकरण व्हावे, स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगारांची अनिवार्यता अट रद्द करावी, व्यावसायिक वाहनांसाठी नो एन्ट्री विभागातील निर्बंधांचा पुनर्विचार करावा आदी मागण्या या संघटनांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.